नमस्कार
वट पौर्णिमा जवळ आली आहे , गुगलवर शोधले तर वट पौर्णिमेची तारीख वेगवेगळी सापडते ,
त्या निमित्त एक गद्दकाव्य लिहिले आहे,
अगदी मुंबईच्या सरहद्दीवर ठाणे शहरात शिरताना, (आतल्या रस्त्याला ) कोपरी गाव
लागते तिथे पूर्वी सर्व जंगल होते , आता तिथे मुंबई हद्दीत खाडी किनारी हरी ॐ नगर हि मोठी वसाहत
उभी राहिली आहे , त्या वसाहतीत शिरण्यासाठी एक रस्ता विकसित झाला , त्या रस्त्यावर
अगदी मधोमध रस्ता दुभाजक म्हणून जणूकाही तो वटवृक्ष उभा आहे , तिथून नेहमी जाता येताना
मला त्या वृक्षाविषयी काहीतरी वाटायचे , आणि आता वट पौर्णिमेला त्याच्या फांद्या तोडल्या जातील तेव्हा जणूकाही
तोच वटवृक्ष त्याची कथा सांगतो आहे अशा रीतीने हे गद्दकाव्य लिहिले आहे.
शहरात उरले सुरले वृक्ष आहेत त्यांच्याही कदाचित ह्याच भावना असतील नाही का ?
- सुरेश पित्रे , ठाणे
मी आहे वटवृक्ष एकटाच !
वट पौर्णिमेसाठी माणूस आला वडाजवळ फांद्या तोडायला
पण वड लागला बोलायला आणि सांगु लागला त्या माणसाला
कुऱ्हाड घेऊन तू आला आहेस माझ्या फांद्या तोडायला
फांद्या रस्त्यावर जाऊन पडतील सुवासिनींना विकायला
माझ्या अंगा खांद्यावर चालविणार आहेस का तू कुऱ्हाड ?
पण जरा बघ ! पक्षी, पाखरांनी थाटलय तिथे वर बिऱ्हाड
आहे मी एकटा रस्त्यामधे, सग्या सोयऱ्यांच्या आठवणीत झुरतोय
होते इथे जंगल, माझ्या सभोवती सखे,सोयरे, माझे सोबती
बिल्डर नामक राक्षसाने, मुळासकट त्यांना उखडून टाकलं
पाण्याविना तडफडून सुकून मरून गेले माझे सख्खे सोबती
सुदैव माझं मी राहलो जिवंत, उभा एकटाच आज रस्त्यावरती
तुम्ही पहात होतात स्वप्नं कधी पुऱ्या होतील ह्या इमारती
माझ्या सख्यांची करून माती, स्वप्न तुमची पुरी होणार होती
मी आणि माझे सोबती देत होते शुद्ध हवा आणि प्राणवायु
आता मी मात्र सतत हुंगतो आहे वाहनांचा विषारी काळा धूर
झाडे कापून माणूस आळवितो आहे शहरांचा कर्कश्श सूर
माझ्या सग्या सोबतींचा जीव घेऊन उभ्या राहिल्या ह्या इमारती
तिथे अनेक माणसांचा , कुटुंबांचा झाला आहे वंश विस्तार
मलाही वाटते, इथे खाली जमिनीवर माझ्या पारंब्या रुजवाव्यात
पण आता जमिनीवर डांबर टाकून, रस्ता झाला आहे टणक आणि
नित्यनेमाने तुम्ही स्वतःचे कापता केस, तशाच कापता माझ्या पारंब्या
नाहीतर त्यांच्या मुसक्या बांधून आवळून माझ्याच अंगावर बांधून ठेवता
आता वट पौर्णिमेला मला पुजायला कमी येतात त्या सुवासिनी
माझ्याभोवती ओतलय डांबर , त्यामुळे जमिनीत मुरत नाही पाणी
मीही आता वाट पाहतो कधी येईल पाऊस आणि मिळेल मला पाणी
पूर्वी कधी काळी प्रदक्षिणा करताना लक्ष तरी देत होते माझ्याकडे कोणी
नशीब माझे, देवाने योजना केली आहे वेगळी माझ्या वंश विस्ताराची
ते पक्षी खातील माझी फळे , विष्ठा टाकतील जमिनीवर, इमारती वरती
त्या इमारतीवर कुठेही रुजतील त्या पक्षांच्या विष्ठेतल्या बिया, आणि !
त्याच इमारतींवर उगवतील वडाची कोवळी रोपे, वाढेल तो वट - वंशवेल
जणु सांगतील कि हो ! इथेच होते आमचे सखे, सोयरे आणि सोबती
उखडून टाकून मारून टाकलेत त्यांना तरी, खुंटणार नाही हा वटवंश
तुमच्या आधी आमचाच होता ह्या जमिनीवर पहिला हक्क
जणु सूड उगवतील त्या इमारतींवर, ज्यांच्यामुळे मेले ते सारे वटवृक्ष
त्या साऱ्या सूड नट्ट्यावर माझ्या एकाकी डोळ्यांचे आहे इथूनच लक्ष
मी आहे वटवृक्ष एकटाच ! रस्ता दुभाजक बनून रस्त्याच्या मधोमध उभा
माझ्या दोन्ही बाजूने सतत चालु असते वर्दळ आणि ये - जा वाहनांची
सवय झाली आहे मला आता त्या वाहनांच्या भोंग्यांच्या कर्कश्श आवाजाची
कान किटले आहेत ह्या शहरी गोंगाटाने, गुदमरून गेलोय वाहनांच्या धुराने
सग्या सोयऱ्यांच्या आठवणीत, दुर्दम्य आशा ठेवुन आहे मी जगण्याची.
लेखक / कवी - सुरेश पित्रे,
पत्ता - " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१